Monday, 10 August 2015

शेवग्याच्या शेंगा

              भारतीय संस्कृतीत live-in -Relationship ही संकल्पना तितकीशी रुचणारी नाही . याच कारण प्रत्येकाच एक स्वतःच जग असत आणि ते फक्त त्यांच  असल्यामुळे त्यात ढवळाढवळ करू नये , हे साधे शिष्टाचार आपण पाळत नाही. त्यांच्या वैयक्तीक गरजा असू शकतात , याचा विचार न करता ,  संस्कृतीच्या पगड्यामुळे समाज फार कोत्या नजरेतून स्वतःचीच मत लादून  परिस्थितीचे परीक्षण करत असतो . 

             उतारवयात एकाकी झालेल्या दोन व्यक्तींना त्यांची space मिळू नये का? ते सहवासाची अपेक्षा ठेवू शकत नाही का? एकमेकाच्या भेटीमुळे दोन व्यक्तींना आनंद मिळत असेल , आश्वस्त वाटत असेल तर समाजाच्या कलुषित दृष्टीकोनामुळे अशा दोन जीवांची घुसमट का व्हावी ?

            पत्नीवर प्रेम करणारे ससाणे (संजय मोने )व नवऱ्याच्या प्रेमाला , प्रामाणिकपणाला मुकलेल्या साठे (स्वाती चिटणीस )  …. जोडीदार गमावल्यामुळे एकाकी झालेल्या या दोन व्यक्तिरेखांची ही कथा आहे .त्यांच्या भेटीला "शेवग्याच्या शेंगा" निमीत्त  ठरत अन  एका निष्पाप नात्याला सुरवात होते .  या कथेला अजून दोन उपकथानकांची जोड देऊन तरुणवयीन , मध्यमवयीन , उतारवयीन तीन पिढ्यामधील नाते संबंध उलगडून दाखविण्यात आले आहेत . 

           नाटक, तीन पिढ्यांच्या आवर्तनातून फिरताना शरीरासक्ती , मानसिक गरज, प्रेम, आपुलकी , स्वार्थ अशा  जीवनातील अनिवार्य घटकांची मर्यादा व गरज स्पष्ट करत .  हलक्या-फुलक्या  व गंभीर प्रसंगाची गुंफण समतोल राखत केल्याने व तीन पिढ्यातील स्वभावविशेषांचे खुमासदार पद्धतीने सादरीकरण झाल्याने  नाटकातील  एक निष्पाप गोडवा शेवटपर्यंत रंगत आणतो . 


दिग्दर्शक-गजेंद्र अहिरे 

No comments:

Post a Comment