Friday, 3 February 2017

लोपामुद्रा

               



      “लोपामुद्रा कवितासंग्रह नसून संवेदनशील क्षणांचा (तुम्हाला सोबत घेऊन जाणारा) मुक्त प्रवाह आहे.  तुमच्या आयुष्याशी थेट भिडणारा .   जीवनातील सूक्ष्म तरंग नेमके वेचून,  वेगळ्या परिप्रेष्यातून जगण्याकडे बघण्यास प्रवृत्त करण्याची   विलक्षण ताकद कवितांत आहे.  कवयित्रीची कमी वयातील प्रगल्भता अचंबित करते  . काही समीक्षक मंडळी साहित्यीक मुल्य वैगरेच्या चष्म्यातून  कवितांची चिरफाड करतील.साहित्यीक मुल्य हा शब्द फसवा आहे.  शब्दांचं भिडणं  अन् मनात रूजणं  महत्वाच वाटतं. शब्दांच्या प्रवाहाला नेमस्तपणाचा बांध घालून आशय उलगडण्याच्या नैसर्गिक कौश्यल्यामुळे कविता प्रवाही झाल्या आहेत . मनाची सूक्ष्म आंदोलन इतक्या तरलतेने, सहजतेने उमटली आहेत की , त्यात आपण नकळत गुंतून  जातो . . 


               लोपामुद्रा, समोरच्याच्या अस्तित्वात जिची मुद्रा लोप पावली आहे, अशी स्त्री . प्रत्येक भारतीय स्त्री ही त्या अर्थाने खरं तर लोपामुद्राच आहे. with choice or without choice...... या संकल्पनेने त्या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्या मनात आकार घेतला. आणि मग अशा कित्येक ‘लोपामुद्रा’ घरी-दारी, शेजारी-पाजारी नव्याने दिसायला लागल्या. त्यांचं भावविश्व खुणावायला लागलं. साखरजाग, जाग, माध्यान्ह आणि निरामय असे त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे ‘माझे’ होऊन आपलेसे वाटायला लागले. ‘लोपामुद्रा’ घडू लागली होती... ... 

          "लोपामुद्रा’  प्रकाशनाच्या प्रसंगी लोपामुद्राची  संकल्पना स्पष्ट करताना कवयित्रीने तिचे मनोगत वरीलप्रमाणे  व्यक्त केले आहे . ती ने  पररुपाशी एकरुपता साधली तरी,  तिला तिच्या अस्तित्वाचा विसर पडलेला नाही, अशी पार्श्वभूमी स्पष्ट करताना त्या , लोपामुद्रा म्हणजे अल्लड वयातील चंचल भावनांपासून  सुरु होऊन एका निरामय टप्प्यावर पोहचणारा भावप्रवास असल्याचं  सांगतात . 

               साखरजाग” “जाग ” “माध्यान्ह” “निरामय अशा वेगवेगळया भागात लोपामुद्राच्या भावनिक आंदोलनाचा वेगवेगळया टप्प्यावरील प्रवास.... भावनांचे अस्फुट आवर्तन  काव्यचित्र संग्रहाच्या स्वरूपात आकार घेऊ लागते . अरुण म्हात्रे म्हणतात,  साऱ्या कविता अबोध मनाचे हुंकार आहेत.  सुमीत पाटील (रेखा-चित्रकार) यांनी कविता अर्थपूर्ण असल्या तरी शब्दबंबाळ नाहीत , अस  नेमक्या शब्दात स्पष्ट केलं  आहे . कविता शब्दबंबाळ नसल्यामुळे,  शब्दांमागच्या भावना मूर्त स्वरुपात डोळ्यासमोर फेर धरु लागतात.  अंर्तमुख करतात.  भावना प्रामाणिक असल्यामुळे शब्दामागचे  गूढ  अलगद उलगडतं जातं, नितळपणे .कवयित्री अवकाशाच्या पल्याड एका झरोक्यातून "ती"  च्यांतील "लोपामुद्रा निरपेक्षपणे शोधतायतं . पुस्तकातील मलपृष्ठ कवयित्रींची नेमकी भावमुद्रा टिपते .  

        लोपामुद्रा ही पुराणातील एक विदुषी, अगस्त्य  ऋषींच्या   वैयक्तीक लालसेतून निर्माण झालेली  स्त्री .  वन्यप्राणी,  वनस्पतीच्या विशिष्ट  सौंदर्याच्या  (मुद्रा) लोपातून तिची निर्मिती झाली होती.  लोपामुद्रा ही सामान्य स्त्री नव्हती.  ती शिक्षीत होती.  शिक्षणानेच तिला आपल्या अस्त्तित्वाची जाणीव झाल्याचे दिसते.  तिने लिहिलेल्या काव्यात ,  वार्धक्यामुळे सौंदर्याचा ऱ्हास होत असला तरी, पत्नी तिचे कर्तव्य पार पडत असताना ,  उत्साही मनुष्याने तिच्याकडे दुर्लक्ष करू नये ,  पत्नीकडे परतावे असा  सूचक सल्ला देत त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली आहे. "लोपामुद्रे ला शिक्षणामुळे झालेली अस्तित्वाची जाणीव फार महत्वपूर्ण आहे. आपण केवळ अगस्ती ऋषींची निर्मिती नसून तिला स्वतःची एक वेगळी ओळख आहे , अस्तित्व आहे , लोपामुद्रा  तिचे कर्तव्य बजावत असताना अगस्त्य मुनींना पडलेल्या कर्तव्याचा विसर, त्यांना खडसावून सांगण्यास जराही कचरत नाही.

              अगस्त्य मुनी आणि लोपामुद्रा ही प्रतिनिधीक प्रतिके आहेत.  आजच्या स्त्री ची परिस्थिती फारशी  बदललेली नाही.  तिने आपले अस्तित्व समोरच्या व्यक्तीत समर्पित केलं  आहे.  अगस्त्य मुनीची जागा पुरुषी लालसा, वर्चस्वाने    घेतली आहे.  त्यातून आपले अस्तित्व शोधताना कवयित्रीला झालेली ती ची भेट कवितांच्या माध्यमातून आपल्या समोर  येते.  कधी अल्लडपणातून ,   स्वप्नांच्या जागण्यातून, जगण्याच्या अनुभवातून,  तिच्या आत दबलेल्या हुंकाराचे प्रतिध्वनी कधी दबक्या आवाजात तर कधी     उन्मुक्तपणे   व्यक्त होऊ लागतात.   मला या कविता म्हणजे ती च्या भावनांचा मुक्त प्रवास, आत्मसंवाद असल्याचे जाणवते.  खोलवर रुतलेलं   .... अंर्तमनात.... अस्वस्थ करणार,   न उमजणार अस काहीतरी शब्दांच्या हुकारांतून मुक्त व्हायला अधीर झालय....   इतकं साचलयं की, आता त्या भावनां कोणतेही बंध न स्वीकारता मुक्त झाल्यायत कवितांच्या स्वरुपात . 

            ती चा प्रवास  अल्लड वयातील मनाच्या निष्पाप  खेळांनी सुरु होतो.  लाडिक खटक्यांचे ...  अवचित आसवांचे....  ,   मधुर स्वप्नांचे  वय .  ...  ती” या क्षणी “लोपामुद्रा असली तरी समोरच्याच्या स्वरुपात पूर्णपणे विलीन झालेली  . आपल्या अस्तित्वाची जाणीव नसलेली .   जगणं  रंगीत झाल्यासारख,   भूल पडल्यासारखं , दुपार सोनेरी ...   मन केशर पिसे ...  असं सगळं स्वप्नवत भासू लागतं .   अधीर श्रावणात तिचे "मी" पण सरले आहे .तिच्यासाठी हे छोटे छोटे क्षण तिचं जग बनलंय ,वास्तव दुनियेशी पूर्णपणे अनभिज्ञ . 

              स्वप्नांच्या दुनियेतून जाग होऊन  , आता हळूहळू वास्तव दुनियेचे कटू विखारी घाव सोसत , जगणे सुंदर होण्यासाठी स्वत:लाच आर्त साद ती घालू लागली आहे.  स्वप्नरंजनातून  आता कुठे सावरु लागली आहे.  तो” केव्हाच जमिनीवर आलाय.  व्यवहाराचा ताळमेळ जुळवताना नात्याचे बंध सैल होऊ लागले आहेत.  तिचा स्वत:शी संवाद सुरु झाला आहे.  त्याचे मुकेपण ती समजून घेण्याचा प्रयत्न करतेय.  मुकेपण की हतबलता.  तिला जाणवते आहे , त्याची तळमळ.  या आपलेपणालाच आपल्या संवेदनात सामावून घेतल आहे.  उमजून घेतल आहे.  इतक की अलवार  मिठीनेही     स्वत्व  विसरुन गेली आहे.  स्वप्नरंजनाला  मुरड घालून ,  त्याच्या कुशीत आपलं  अस्तित्व समर्पित केलं  आहे.   अपेक्षा, इच्छांना तिने बांध घातला असताना,  ती सांजवेळ तिच्या आयुष्यात येते.  त्याच्या मिठीत रुजण्यासाठी तिला प्रतीक्षा करावी लागते.  तगमग वाढतेय.  का नाही खडसावत  ती त्याला लोपामुद्रेसारखी ? आपल अस्तित्व विसरुन गेलीय का ती
     
  नात जुन होताना नव्यानेच काही गोष्टी कळू लागतात. मनात साठलेलं  अव्यक्त ................आसवासवे  गालावरच्या खळीत ..............भिजलयं  स्वप्न.....हळूहळू सोबतीला उरलीयत फक्त स्वप्न . स्वप्न आणि  सृष्टीच्या सोहळयात ती मिसळून गेली आहे.  निसर्ग तिला सुखावू लागला आहे. "inception "  या सिनेमात माणसाला स्वप्नातून जाग करण्यासाठी झटका देण्याची कल्पना आहे.  हा झटका तिला मिळाला आहे.  तिला जाग आलीय परंतु फार उशीर झालाय.  स्वप्नांना गवसणी  घालताना  तिचे पंख थकले आहे.  पाखरु भिजलं  आहे...............आतल्या आसवांनी ...............जगणं ,  जमवून  घेण यात तिची प्रचंड घुसमट व्हायला लागली आहे.  अव्यक्त भावनांनी साचलेपण खोलवर रुतलं  आहे. 

           “साखरजाग मधला  गोडवा   लुप्त होऊन जाग येते. जगण्याचं भान येऊ लागतं . आयुष्यातली क्षणभंगुरता  जाणवू लागते.  दु:ख अश्रुखाली झाकून एकटंच आनंद शोधण्याचा केविलपणा प्रयत्न सुरु होतो.  एकमेकाला समजण्यासाठी शब्दांच्या माध्यमाची कधी आवश्यकता भासली नव्हती,   इतके   आंतरिक दृढ बंध होते . या  बंधाची शिवण  उसवत चालल्याने ती अस्वस्थ आहे.  त्याने तिचा शोध घ्यावा अस तिला वाटत.  ती वाट पहातेय. त्याच्या धडकण्याची .... खोलवर आत झिरपण्याची.  शब्दाविना तिला फक्त त्या प्रेमळ स्पर्शाचा दिलास हवाय.  हा आशेचा कवडसा आपल्या ओंजळीत  गोंजारण्यासाठी ती आतूर झालीय.तिला आपल्या अस्तित्वाची जाणीव आताशा तीव्रतेने होऊ लागलीय.  मेकअप आणि ती  यातलं नेमक तिच आस्तित्व ती शोधू पाहतेय  .  यात  मी पण हरवून गेलय.    या अस्तित्वाचा शोध आता सुरु झालाय. तिला गृहीत धरल्याची बोच आहे. आतल्या आवाजाने झालेले आघात  सोसवेना  झाल्यामुळे तिला नाही म्हणायला शिकायचं.
            
           स्वप्न” ही कविता सर्वांच्या  आयुष्याला स्पर्श करणारी  आहे.  आपल्या अव्यक्त अमूर्त इच्छा आभासी स्वरुपात का होईना, मूर्त स्वरुपात दिसू लागतात . नाहीतर प्रत्यक्ष आयुष्य स्वप्नच तर आहे.  मृगजळासारख पकडून ठेवता येईल का क्षण?  आता होता..........गेला भुर्रकन...........  ना संघर्ष ना काही.  स्वप्नांवर आपलीच हुकूमत असते.  स्वप्नच ती....  वास्तवाचा दुसरा पदर उलगडतात तेव्हा हळूहळू स्वप्न जणू मुकी होऊन जातात. आपल्या कल्पनांना अवकाशही अपुर पडत.  प्रत्येक क्षण एक स्वप्नंच तर असत.  

            माध्यान्हाला तिच्या अंर्तमनातले संवाद तीव्र होत चालले आहेत.  चेहऱ्यातले भाव शोधणे , त्याचे अर्थ समजून घेण्याइतकी प्रगल्भता तिच्यात आलीय.  सर्वच बदललंय . भावनिक मुद्रांना वेगळे अर्थ दिसू लागले आहेत.        सुखाच्या शोधात त्यानंतर येणाऱ्या दु:खाचीच भीती वाटू लागलीय.  दु.खाच सावट सुखाची चव बेचव करतय.  मग ही अविरत धडपड कशासाठी होती?  सुखाच्या या टप्प्यावर तर पोहचलात आता...   सुखानंतर दु:ख येत ही कविता    आयुष्याला थेट भिडणारी कविता, आपल्याच आयुष्याची प्रतिमा आहे .  आपण सुखाचा पाठलाग करत असतो परंतु ते प्राप्त झाल की मग पुढे कायकधी कधी दु:खापेक्षा सुखाचीच भीती वाटू लागते.   या पाठलागात आपण स्वत:लाही विसरुन जातो.       
          
         आपल्या प्रवासाकडे ती अलिप्तपणे पाहतेय.  या टप्प्यापर्यंतची वळणे, खाचखळगे  पार करुन ती स्थिरस्थावर झालीय.  सर्व ओझं मागे सारून , निरामयतेकडे तिचा प्रवास सुरु झालाय . मनातील कल्लोळ शांत झालाय . धीरगंभीर समुद्रासारखा . मी पणाच्या खोट्या कल्पनेतून ती बाहेर पडू पाहतेय. शांत होऊ पाहतेय.   भौतिक विश्वातून आता आध्यात्मिक ओढीने तिच मन भारुन गेलय.  त्या विठ्ठलात तिला आनंदाचा कंद सापडला आहे.       तिच्यातले   मी पण आयुष्याच्या सांजवेळी गळून पडलय.  तिची  "मी "पणाची आभासी मुद्रा लोप पावलीय.            
         
          दीप्ती नवल यांच्या "लम्हा लम्हा " सारख्या या कविता,  मागच्या कवितेच ओझ घेऊन येतं असल्या तरीही , तिला आलेलं जगण्याचं भान,तिच्यावरचं ओझं रितं करतं ,  एका निशब्द शांत टप्प्यावर नेत आहे  . कोणतही ओझ नाही.  अवकाश, सागर एक .... पुसटशी रेषही नाही त्यावर.....  किलबिलाट नाही.  फक्त शुध्द निषाद  आत पाझरतो आहे.  फक्त नि ....  "लोपामुद्रा" , निरामय मुद्रेत  परिवर्तीत झाली आहे.  सुख ,दु:ख, स्वप्न, अहं लोप पावलं   आहे.  उरलीय  निरामय अवस्था .  जगण्याच्या पलीकडची ..  तिच्या भावना, इच्छा लीन झाल्या आहेत,   तिला आलेल्या आत्मभानासमोर . कोणताही कल्लोळ नाही.  प्रत्येक कविता दुसऱ्या कवितेशी जोडलेली आहे.  कादंबरी सारखी उलगडत जाणारी.  तिच्या भावनांचे एक वेगळेच कथानक आकार घेऊ  लागले.  तिच्या मनातल खोलवरच, सांगावस वाटणार तरीही अव्यक्त....  कवयित्रीच्या आत्मियतेतून तिच्या मनातील निरगाठी उलगडतात  .  खळखळत्या षडजातून आलाप घेणारे आयुष्याचे स्वर कोमल, शुध्द निषादावर विश्रांती घेत निरामय, अध्यात्मिक अवस्थेत स्थिर होतात.  पुन्हा षडजाकडे न परतण्यासाठी.  नि.... नि.... नि...  शुध्द....  कोमल...  निरव शांतता.

       सर्वच कविता नितांत सुंदर आहेत.  या केवळ ती च्या कविता नसून सर्वांच्याच आयुष्यात उमटणाऱ्या सादाचे, प्रतिसाद आहेत.  स्वप्न, सुखानंतर दु:ख, तो आणि ती  या कविता आपल्या मनातल नेमक व्दंव्द,  इच्छा, स्वप्न ,संघर्ष  चितारतात.  सगळ्याचं कविता ,   मनाला हलके झोके देत वेगळीच अनुभूती देतात.   शब्दांची वळण अन त्यामागचे भाव प्रवाहीपणे मनाच्या तळकप्प्यात  उतरत जातात , कोणतीही संदीग्धता  न ठेवता . हा सुंदर अनुभव घेण्यासाठी लोपामुद्रा कवितासंग्रहाचा आस्वाद जरूर घ्या. 








           
                        
            

No comments:

Post a Comment