Friday, 18 August 2017

मला काहीच प्रॉब्लेम नाही (Movie)

             


            "मला काहीच प्रॉब्लेम नाही " या सिनेमाचे नकारात्मक समीक्षण वाचूनही मी सिनेमाला जाण्याचा निर्णय  घेतल्यामुळे मात्र मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. याउलट आजच्या तरुण पिढीच्या गोंधळलेल्या मानसिकतेवर अचूक भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने एक वेगळा अनुभव दिला . आयुष्याचे वेगवेगळे कंगोरे तपासून पाहण्याअगोदरच स्थिरस्थावर झालेली आजची पिढी , सुखाची नेमकी परिभाषा न उमगल्यामुळे गोधळून जाते . सुखाची परिभाषा समजणे तशी अवघडच . वाचन , चिंतन, संवाद  याच्या अभावामुळे  स्वतःला नेमकं काय हवंय याचा थांगच लागत नाही . आजूबाजूला दिसणार चकचकीत आयुष्य मग खुणावू लागत .   चकचकीत वेष्टनात गुंडाळलेल्या चाकोरीबद्ध जगण  परिपूर्ण वाटायला लागतं .   मन , भावना , संवाद यांना  ही पिढी पारखी झाली आहे . आपल्याकडचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे समोरच्याला गृहीत धरणे . वास्तविक प्रत्येकाचे स्वतःचे असे एक आयुष्य असते , स्वतःचा असा एक परीघ असतो हे मान्य नसल्यामुळे दोन पिढ्यांचे संघर्ष सुरु होतात .संक्रमणावस्थेतून जाताना निर्माण होणारा गोंधळ , बदल पटकन टिपता न आल्यामुळे होणारे संघर्ष अटळ असतात .  दोन्ही पिढ्यातील सहजता हरवत जाते . हा विषय प्रत्येक पिढीचा आहे . एक पिढी नवीन  बदलाला सामोरी  जातेय  तर दुसरी पिढी बऱ्यापैकी सरसावली आहे . दोन्ही पिढीतील संवादाच्या अभावामुळे अनेक पेचप्रसंग निर्माण होतात. दिग्दर्शकाने हा बदल सूक्ष्मपणे टिपला आहे . जगण्याचं सूत्रच जणू त्याने उलगडून दाखवलं आहे .

           अजय आणि केतकी या जोडप्याची ही कहाणी , वैदर्भीय आणि कोकणी पार्श्वभूमीच्या  रिती -रिवाजाच्या  विसंवादातून उलगडत जाते. अजय संयत शांत स्वभावाचा तर केतकी स्पष्टवक्ती , थोडीशी फटकळ  काहीशी dominating  स्वभावाची .  अजयची समस्या म्हणजे त्याला कशालाही नाही म्हणता येत नाही , पटकन निर्णय घेता येत नाहीत  . घरच्यांचं  देण्या -घेण्यावरून फिस्कटल्यामुळे केतकी लिव्ह -इन - रिलेशन मध्ये राहण्याच्या निर्णयापर्यंत येते . तिथेही समस्या मग लग्नं करायचच आहे एक दिवस तर कोर्ट -मॅरेज करण्याचा निर्णय ती घेते .इथेही निर्णय तिचं घेते .  इथून पुढे आजच्या पिढीच्या समस्यांची सुरुवात होते.

                 आजच्या पिढीच्या तरुणांची सुखाची व्याख्या म्हणजे चकचकीत फ्लॅट , गाडी , आठवड्याअखेर हॉटेलमध्ये जाणे अशी सर्वसाधारण असते . खरतर हे चाकोरीबद्ध आयुष्य बहुतांश लोकांचं आहे .  चकचकीत भिंतींनी डोळे सुखावतात मनाचे काय ? संवादाचे काय ?  हे सुख विकत घेताना जो  वेळ द्यावा लागतो आहे त्यातून एकमेकांकरिता  वेळचं उरत   नसल्यामुळे  नात्यात  दुरावा निर्माण होऊ लागतो . अजय  त्याचे मन कधीही उघड करत नाही . केतकीला कधीही नाराज करत नाही . तिला  यांत्रिकवत  वाटतं . तिला हवंय उत्स्फूर्तपणे , वाहवत नेणारं काहीतरी....  पण तिलाही उमगत नाही नेमकं काय ? तिची अवस्था अशी झालीय   ,


                                                 धागे गुंतले अंतरीचे अंतरी
                                                 काय मज हवे कळेना
                                                 काय तुझं द्यावे उमजेना

                                               स्वरांनी भारले  अंगण इवले
                                               सूर का हरवले कळेना
                                               शोधूनही गाभा सापडेना

                                                कळावी माझ्या  अंतरीची
                                                मी  न सांगता  व्यथा
                                                तुज कसे सांगू कळेना 
                                              
                                              मनाचे मनाशी  खेळ सारे
                                              मन मनास सावरेना
                                             तू व्हावे मन माझे 
                                              नाते  तरल सोपे उलगडेना

              एक सुखी त्रिकोणी कुटुंब आहे . कधीतरी बदल म्हणून मित्रांच्या पार्ट्या आहेत . दिग्दर्शकाने या पार्टीचा प्रसंग इतक्या सूचकपणे चित्रित केला आहे कि  संथ , चाकोरीबद्ध आयुष्याच्या छटा मनाला थेट भिडतात . त्यातला यांत्रिकपणा मनाला सुन्न करतो . तसं वर वर परिपूर्ण वाटणारं आयुष्य  आतून संथ लयीत येणाऱ्या वादळाला साद घालतंय . हे वादळ घोघावतंय तिच्या मनात . आयुष्याची सर्व सुख प्राप्त झाल्यावर जो रितेपणा येतो आयुष्यात तो माणसांची मानसिक स्थिती फार विचित्र करतो . असंच काहीसं रितेपण तिच्या आयुष्यात आलंय . अशावेळी तिला अजयबरोबर संवादाची फार गरज वाटतेय परंतु त्याच्या अबोल स्वभावामुळे आतली खळबळ आतच साचून राहिलीय . तिला दोंघांशिवाय तिसरं कुणी नकोय अशावेळी अजयच्या घरची माणस त्यांना अवेळी भेटायला येतात  . मनाच्या  साचलेपणाला मुक्त करण्याचा तिचा हाही मार्ग बंद होतो . यातून ते कसे मार्ग काढतात ? हा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष घ्यावा लागेल . 

            चित्रपटातील छोटे -छोटे प्रसंग दिग्दर्शकाने खुमासदार चित्रित केले आहेत . एक प्रसंग असा आहे . अजयच्या ग्रहशांतीसाठी घरच्यांनी पूजा करायचं ठरवलेलं असतं . केतकी म्हणते त्याला शांतीची काय गरज आहे , तो शांतच आहे . दुसऱ्या प्रसंगात ती धार्मिक विधी टाळण्यासाठी चक्क तिला पाळी आल्याचं सांगते .   मोठ्यांच्या अध्यात्मिक भावना दुखवू न देता वेगळाच मार्ग चोखाळत ती आपली स्वतंत्र वृत्ती वेळोवेळी दाखवून देते . दोघांच्या खाजगी क्षणांच्या वेळी अजयच्या हाती असलेला मोबाईल आजच्या पिढीच्या जगण्यातील  तुटकपणा , विसंवाद स्पष्ट्पणे दाखवून देतो .  कोणत्याही प्रसंगात आततायीपणा नाही . जे सांगायचं आहे ते थोडक्या शब्दात आणि नेमकेपणे सूचित केलं आहे . दिग्दर्शकाने जे प्रसंग उभे केले आहेत , त्यातून नेमका अर्थ उलगडत जातो . साधी सोपी गोष्ट वाटताना संवादाच्या अभावामुळे ती कशी गुंतागुंतीची वळण घेऊ लागते हे प्रसंग दिग्दर्शकाने कुठेही अतिशयोक्तपूर्ण मेलोड्रामा निर्माण न करता छोट्या छोट्या प्रसंगातून ठाशीवपणे चित्रित केले आहेत . दोन पिढीतील संघर्ष भडक  न करता , कोण चूक कोण बरोबर याचं  विश्लेषण न करता त्यातून काय समस्या निर्माण होऊ शकतात हे अत्यंत संयमितपणे दाखविले आहे .या चित्रपटाला गोव्याची सुंदर पार्श्वभूमी आहे .  गोव्याचं सौंदर्य आणि  कोंकणी धून मन मोहवते . कॅमेऱ्याने गोव्याचे सौंदर्य अचूक टिपले आहे .
         

           स्पृहा मॅडमनी ज्या सखोलतेने केतकी साकारली आहे त्याला तोड नाही .केतकीच्या  मनातील कोंडमारा सहजसुंदर मुद्राभिनयातून मनाला भिडतो . वरवर  साधी वाटणारी ही भूमिका तशी अवघड आहे .  त्यांच्या कवितांतून ओथंबणारी संवेदनशीलता त्यांच्या भूमिकांतून सहजपणे व्यक्त होते . किंबहुना या प्रगल्भतेमुळे ही गुणी अभिनेत्री अशा संवेदनशील भूमिकांना न्याय देऊ शकते . गश्मीर महाजनी यांनी अजयची संयत भूमिका जिवंत केली आहे . गश्मीर व स्पृहा यांची अभिनयाची केमिस्ट्री छान जुळली आहे . कपल म्हणून ते फार विश्वसनीय आणि सहज वाटतात . विदर्भ आणि गोव्याच्या भाषेतील गोडवा कानाला सुखावतो . प्रत्येक कलाकाराने त्याचं काम चोख बजावलं आहे . गोव्याची ती सुंदर घर भविष्यात दिसतील किवा  नाही , पर्यटनाच्या , जागतिकिकरणाच्या नावाखाली हे नैसर्गिक सौंदर्य लोप पावणार आहे याची  खंतही चित्रपटातून व्यक्त होते . जुन्या पिढीतील संथपणा  , नव्या पिढीचा वेग त्यातून निर्माण होणार कोंडमारा , जीवनाला सामोरे जाताना निर्माण होणारी द्विधा अवस्था , त्यातून उद्भवणारे प्रसंग चित्रित करताना योग्य समतोल साधण्यात  आला आहे. प्रकाशयोजना इतकी सुंदर आहे की चित्रपटाचे वेगवेगळे मूडस मनाला आतून स्पर्श करतात . अजय आणि केतकी इतकं समजूतदार कपल असताना त्यांच्यात विसंवाद घडतातच का , हा प्रश्न सुरवातीला जाणवतो . त्यामागचा सुप्त अर्थ उकलणे खरोखरंच आव्हान होतं . आपल्यातील  नेमका विसंवाद कधी कधी स्वतःला सहजतः लक्षात येत नाही परंतु दिग्दर्शकाने  भावना नेमक्या टिपल्या नाहीत तर प्रभावीपणे चितारल्या आहेत  .


              चित्रपट पाहताना एक नकळत स्वतःशी एक संवाद सुरु होतो . दोघेही मनाने चांगले ? मग असं का होतं ? काहीवेळा समोरची दोन्ही माणसे अगदी परफेक्ट असतात . तरीही सूर जुळत नाहीत . का होत असं ? विसंवाद कि अजून काही कारण ? का सुख बोचतंय ? काहीच कळत नाही .सोचा था घर बना कर बैठूगा  सुकून से पर घर की जरूरतों ने मुसाफिर बना डाला , या गुलजार यांच्या ओळी सिनेमा पाहताना आठवतात .  प्रत्येक जोडप्यात असा बॅडपॅच , दुरावा कधी ना कधी येतो . त्यात दोघांची कुटुंब दुरावलेली . दुसरा कोणताही मानसिक आधार नाही . केतकी  एकूणच आयुष्यात आलेल्या  पोंकळीमुळे अस्वस्थ झालीय , चिडचिडी झालीय . ती घटस्फोटाच्या  निर्णयाप्रत येण्याइतकी उद्विग्न का होते ?  वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या का होतात ? संवाद नसल्यामुळे ? मग यातून मार्ग काय ?  या सर्व प्रश्नांची उत्तर अन तुमच्या प्रश्नांची  उत्तरही चित्रपटात सापडतील . तरुणांनी  हा चित्रपट  आवर्जून पाहावा  अन जुन्या  पिढयांनीही . कदाचित तरुणांचा यांत्रिक आणि बुजुर्गांचा रीती -रिवाज , लादण्याचा गोंधळ कमी होऊ शकेल .  तरुणांना सुखाची नेमकी गुरुकिल्ली नक्कीच सापडेल . हा चित्रपट जरूर पहा .                   
                         

No comments:

Post a Comment