Tuesday, 8 October 2019

बोल माधवी

   


       'बोल माधवी ' कविता संग्रहाच्या दोन  गोष्टींनी माझ लक्ष वेधून घेतलं.एक म्हणजे या पुस्तकाचे मुखपृष्ठ.एका आयताकृती बॉक्स मध्ये बंदिस्त माधवी,तोंडावर पट्टी...जणू तिच्या आयुष्याचा सिमीत परीघ दर्शविणारी.
     दुसरे म्हणजे ... आसवारी काकडे अनुवादिका होत्या . चन्द्रप्रकाश देवल यांच्या काव्य रचना कधी वाचनात आल्या नव्हत्या.परंतु, आसावरी काकडे यांनी अनुवादीत केलेल्या  दिप्ती नवल याच्या 'लम्हा लम्हा' चा प्रभाव अजूनही मनावर असल्यामुळे पटकन पुस्तक हातात घेतलं.
       सुरवातीला कवीची भुमिका वाचली. महाभारतातील माधवी ची कथा वाचून खूपच अस्वस्थ झालो.विश्वमित्र यांचा शिष्य गालव  विद्या संपादन केल्यावर गुरुदक्षिणेचा आग्रह धरतो.त्यामूळे ते त्याच्याकडे 800 अश्वमेधी घोड्याची मागणी करतात.गालव ययाती राजाकडे घोड्याची मागणी करतो. ययातीची तेव्हा, गालवची मागणी पुर्ण करण्याची परीस्थिती नसल्यामुळे याचकाला रिक्त हस्त पाठवायचं नाही म्हणून घोड्याच्या बदल्यात आपली मुलगी देतो.गालव तिला अयोध्या नरेशाकडे  एका वर्षासाठी एक पुत्र होईपर्यंत ठेवतो.त्या बदल्यात 200 घोडे घेतो.
         800 घोडे प्राप्त होईपर्यंत माधवी एक साधन बनून रहाते. जनावराच्या  बदल्यात.यातली जनावरं कोण? मन अजूनच अस्वस्थ झाल.
या ओळी वाचुन....

 अयोध्या से लेकर हस्तिनापूर तक
सोनागाछि से भिंडी बाजार तक...
जहा जहा आदम की बस्ती हो
मानचित्र मे नि:संकोच अपनी अंगुली रखना
ठिक अंगुली के पोर के नीचे से
खदबदाती प्रकट होगी स्त्री!
दहेज के एवजाने मे अधजली
अथवा जलने को सन्नध्द
संखिया खाने से पहले...
घर भर के बर्तन,कपडे,जादू पोचे
और नाश्ते का काम
हडबडी मे निबटाती
तुम्हे जो भी स्त्री दिख जाए
समजना माधवी है...

       मला आठवण झाली आम्रपलीची.तिचा दोष काय तर सौंदर्य.वैशालीनगरीची शांतता टिकून रहावी म्हणून तिला नगराच्या स्वाधीन करण्यात येतं ,वेश्या म्हणून. इथे ती साधन झाली होती तिथे माधवी. मनाची सगळी  टोकं हलवून टाकतात या व्यथा.खूप खोलवर रुतत जातं त्यांच स्पुंदण  .डोळ्यातून नकळत व्हावू लागते त्यांची आणि आपलीही अगतीकता.आज काय वेगळ चित्र आहे?तिला अनंत कालची माता,हिमालयाची सावली वैगरे रुपकं जोडून एका कोषात बांधूनच तर ठेवलय आम्ही .  हिमालयाची सावली ....सावलीच शेवटी.फरफटत जायचं.तिच्या इच्छा,आकांक्षा,  प्रतिभा यांना वाव द्यायला आमची  हृदये हिमालया एवढी विशाल थोडीच आहेत.
     कालची आणि आजची माधवी वेगळी आहे का ?या प्रश्नाचे उत्तर  कवितेतून मिळते.तिच मौन आणि मौनातील वेदना ' स्त्री असण्याचा अर्थ 'या कवितेतील खालीलओळीतून प्रखरपणे प्रकट होते. नाही काळजाला टोचते.

    धरती सुद्धा तूझचं एक रुप
     सगळ काही चुपचाप सहन करन
      हेच तिच नशीब...
       आतल्या आत लाव्हा बनून
       खदखदत रहायच...
       आणि वर वृक्ष वेलींच्या मुळांशी
       हसत रहायचं...

       माधवीच मौन...मनात भिनतं.हळुहळु मनावरची खपली उचकटू लागतात.जखमा भळाभळा व्हावू लागतात.कवीच्या टोकदार परंतु प्रामाणिक शब्दांतून पुरुषाचा ढोंगीपणा , स्वार्थीपणा लख्ख उजेडासारखा दिसू लागतो.माधवीची मौनातील विविध रुपं मनाभोवती फेर धरुन नाचू लागतात, नव्हे मन भंडावून सोडतात.
      कालच्या आणि आजच्या स्त्रीची वास्तविकता दर्शविणारे इतके चपखल,प्रामाणिक,अचूक  शब्द माझ्या वाचनात आलेले नाही.तिच दु:ख ,व्यथा,हतबलता सगळच...कवीने अगदी खोलवर शोध घेत ,तिच्या मौनाला वाचा फोडली आहे. तिच्या मौनामागचा आक्रोश  मला काही परिणामकरीत्या तुमच्या हृदयात रुजवता येणार नाही.त्यासाठी तिच्या मौनाचं चिंतनच तुम्हाला तिच्या व्यथेच्या मुळाशी नेऊ शकेल.एवढचं सांगतो जरुर वाचा .....स्त्रीच्या मौनाचा प्रवास... नाही...आत्मशोध घ्या प्रामाणिकपणे तरच माधवी तुमच्याशी बोलेल...नाहीतर पुन्हा कोषात स्वत:ला लपेटून मौनाचं रुप धारण करेल.
 

    

No comments:

Post a Comment