Saturday, 18 February 2017

रिश्तो से बढकर

                “रिश्तो से बढकर   नात्यांच्या विषयावरील , प्रेमचंद यांचा निबंध शालेय पाठ्यक्रमात होता.  एखाद्या नात्याला आपण "समान" जोडतो तेव्हा, ते नात तकलादू असतं ,  असं कटू वास्तव त्यांनी निबंधात मांडलं  होत .  ती माझ्या "बहिणीसमान "आहे, तो माझ्या "मुलासमान" आहे इ.  प्रेमचंद यांनी एक कटू पण व्यवहारी प्रश्न उपस्थित केला होता,  जेव्हा आपण अशाप्रकारे नाती जोडतो तेव्हा खरोखरच त्या नात्याचे अधिकार देऊ शकू का?   एखाद्याला मुलगा म्हटल तर मुलाचे सर्व अधिकार देऊ काव्यवहारी भाग बाजूला ठेवला तरी त्यांना अस म्हणायच होतं ,आपण खरोखरच मुलासारखे त्याला स्वीकारु शकू का? रक्ताची नाती ज्या प्रमाणे   स्वीकारली जातात ,  त्या स्वरूपात अशी नाती खरोखरच स्वीकारली जातील काय ?   तेवढेच निर्व्याज्य प्रेम देऊ शकू का? रक्ताचे संबंध सोडले तर इतका सहजपणा इतर नात्यात अभावानेच आढळतो .  फार लांब कशाला रक्ताच्या नात्यातील भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे स्वीकारलं जात का ?.  व्यवहाराचा प्रश्न येतो तेव्हा,  स्वत:च्या असलेल्या  बद्दलच मायाभाव प्रथम जागृत होतो.

                उदा . स्वतःचा मुलगा सर्वसाधारण असला/त्यात काही दोष असले तरीही त्याकडे आंधळ्या मायेने दुर्लक्ष  करून सर्व सुविधा दिल्या जातात . तोच तुमच्या मुलाव्यतिरिक्त रक्ताच्या नात्यातील किंवा  अन्य सदस्य असेल तर  त्याच मायेने त्याच्याकडे लक्ष दिले जाईल , काळजी घेतली जाईल असे नाही . त्यात आपल्याकडील संस्कृती अशी की , मुलाच्या पालनपोषणापासून त्याच लग्न , मुलं यांची काळजी घेण्यापर्यंत सर्व जबाबदारी पालकांचीच . यात होत असं की , मुलांचे स्वतःचे असे गुण / कर्तृत्व अभावानेच उलगडतं . या प्रक्रियेत घराण्यातील किंवा अन्य खरोखर लायक , गुणवंत सदस्यावर नकळत अन्याय होतो . "समान" ची संकल्पना  समोरच्याला नेहमी त्याच्या  अस्तित्वाची जाणीव करून देते . तो जो आहे तो आहे , अन्य कुणाचा मुलगा,भाऊ, बहीण होऊ शकणार नाही . 

         आजच जग व्यवहारी होत असताना रक्ताच्या नात्यांनाही दुर्लक्षिल जात,  तिथे जबरदस्ती नाती जोडलेल्या मुलीसमान, मुलासमान, बहिणीसमान नात्यांची काय कथा? मग अशी  वरवरची   नाती का जोडली जातातसर्वसाधारण अस दिसून येईल,खूप मदत करणाऱ्या मुलाला मुलासमान उपाधी दिली जाते.  साधारणत: तरुण मुलांना भावासमान संबोधल जात.  एक सामाजिक सुरक्षाही त्यामागे असते.  प्रत्यक्ष होत काय?   त्यांना सख्ख्या  नात्यासारख स्वीकारल जात कातर याच उत्तर नाहीच मिळेल. परंपरेने जे बिंबवलं गेलं आहे , त्या चाकोरी बाहेर कुणीही सहजता जात  नाही . मानसशात्रीय दृष्ट्याही नात्याची नैसर्गिक ओढ रक्ताच्या नात्याकडे अधिक असल्याचे दिसून येते . 

                समान या संज्ञेत आता "बायकोसमान "हा शब्दही समाविष्ट झालाय . लिव्ह इन रिलेशनशिप हे त्याचं काळानुरूप उदाहरण  आहे . जेव्हा जबाबदारीची वेळ येते तेव्हा या नात्याचा कस लागतो . सामाजिक जबाबदारी नसल्यामुळे वेगळ्याच समस्या उद्भवतात . "समान " या शब्दात नैसर्गिक जबाबदारी अपेक्षित नसल्याने,  अश्या नात्यात विलक्षण गुंतागुंत निर्माण होते. नातं कोणताही असो ते आंतरिक तळमळीतून जपणं महत्वाचं असतं  . प्रश्न असा आहे की , जे मानीव नातं आपण स्वीकारतो त्याला खरोखरंच न्याय देतो का ? का केवळ एक तात्पुरती उपाययोजना म्हणून त्याकडे पाहतो , असे  अनेक पैलू तपासणे आवश्यक आहे . अन्यथा अशा नात्यांचा दुरुपयोगही होऊ शकतो . अश्या नात्यात नाती लपवण्याकडे जास्त कल असतो . जी नाती लपवावी लागतात त्यात मग तितकासा सहजपणा उरत नाही . जी  सहज नाहीत  , नैसर्गिक नाहीत अश्या  नात्यांचा जगण्याच्या कसोटीवर कस लागतो . 

                  मैत्रीचं नातं रक्तापलीकडल असतं वैगरे .दोस्तीची अनेक उदाहरणं दिली जातात पण ती दुर्मिळ आहेत . मैत्रीच्या नात्यात रक्ताच्या नात्याप्रमाणे येणारं सामाजिक , नैतिक दडपण नसतं . तरीही मैत्रीत काहीवेळा अपेक्षांचं ओझं असतंच . अदृष्य मैत्रीचं नातं फार सुंदर असतं . कोणतीही अपेक्षा नाही . समोरच्याच्या प्रेरणेने मुग्ध व्हायचं त्याच्या नकळत . स्वतःला मैत्रीच्या धाग्यात बांधून घ्यायचं त्याच्या नकळत . ही मैत्री जपायची स्वतःशी त्याच्या नकळत . किती सुंदर नातं ! एकमेकांवर ओझं न होता. मुक्त झऱ्यासारखं . 
                   कोणतंही नातं निरपेक्ष नसतं . एक कार्यकारणभाव नेहमीचं असतो . तो जपला गेला कि मग दिशा स्पष्ट होते .   प्रत्येकाच्या जीवनशैलीप्रमाणे  त्याचा जगण्याचा स्वतःचा असा एक परीघ असतो . रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्यातील हा परीघ काहीसा अन्य जबाबदारीतून मुक्त असतो . या परिघाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केलात तर ते नातं डळमळू लागतं . रक्ताच्या नात्याला ही स्वतंत्रता सहजता प्राप्त होते . आजकाल प्रत्येकाला त्याच्या स्पेसची फार चिंता असते . या स्पेस मधून थोडा वेळ मिळाला तर त्यात नाती जपण्याचा प्रयत्न केला जातो . परंतु  एखाद्याच्या स्पेसला थोडातरी धक्का लागला तर ते नातं डळमळू लागतं . मैत्रीच्या नात्यात रक्ताचं सामाजिक बंधन नसल्यामुळे नात्याचा कस लागतो . कोणतही नातं असो त्यात एक सहजता हवी . स्वच्छ वाहणाऱ्या पाण्यासारखी , सहज आपल्या सोबत घेऊन जाणारी . अशी सहजता नसेल तर कोणतीही नाती डळमळू लागतात . 

             नाती आहे  त्या स्वरूपात स्वीकारल्यास भ्रमनिरास होणार नाही .नात्याचं गूढही अनाकलनीय आहे .मायेचा पाझर कुठल्या दिशेने वळेल सांगता येत नाही . अश्या  नात्यात अवास्तव अपेक्षा न ठेवणेच उचित होते .  कितीतरी नाती रक्ताच्या नात्याशिवाय घट्ट विणलेली आहेत. परंतु अशी उदाहरण फार तुरळक असतात.  प्रेमचंद यांनी मांडलेल्या कटू वास्तवाची धार आजही कमी झालेली नाही.  याउलट रक्ताची नातीही आज व्यवहारी होऊ लागली आहेत.  समाजातील खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच मुलीला बहिण म्हणणारी आणि स्वार्थासाठी तिला संपवणारी आई,   पोटच्या मुलीवर अत्याचार करणार बाप हे आजच चित्र प्रेमचंद यांनी पाहिल असत तर कदाचित प्रेमचंद यांची लेखणीच गोठली असती.  नाती  जुळवून जमत नाहीत, तरीही सामाजिक दबाबावापोटी तर कधी स्वार्थापोटी अशी नाती जबरदस्ती जुळवली जातात . राजवाडे यांचं "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास "हे पुस्तक वाचल्यास नात्यांची गरज  , विवाहसंस्थेची गरज इत्यादी गोष्टी उमजू लागतात . त्यामागे मोठी समाजशास्त्रीय गुंतागुंत असल्याचं हळूहळू लक्षात येतं . नैसर्गिक सहजपणा असल्याशिवाय कुठल्याही नात्यात तरलता येत नाही.  नाती स्वार्थापलीकडीलच्या नैसर्गिक बंधांनी  जुळलेली  असल्यासच   रिश्तो से बढकरहोतात.  

No comments:

Post a Comment