Friday, 8 September 2017

Love and Marriage

            प्रेम,लग्न  हि खाजगी बाब आहे परंतु भारतासारख्या विविध संस्कृतींनी भारलेल्या देशात ते तितके खाजगी राहत नाही . कारण प्रत्यकाचे मूलभूत स्वातंत्र्य , जगण्याचा स्वतंत्र परीघ आपण मान्य करायला तयार नसतो . आता प्रेम कुणी कुणावर करावे याला काही नियम आखून देता येतील का ? ती तर अविरत सरितेसारखी वाहत राहणारी  कोमल भावना आहे . सभोवार दृष्टीक्षेप टाकला तर लक्षात येईल या समस्या मध्यमवर्गीयांना जास्त भेडसावत  असतात . म्हणजे समाज , जात , व्यवहार ,पत्रिका , मंगळ , प्रतिष्ठा इत्यादी .  सुनील गावस्कर वैगरे सारख्या प्रतिष्ठित व्यक्तींना अशा समस्या येत नाही कारण त्यांचा जीवनाचा फोकस निश्चित असतो .   मध्यमवर्गीय समाज अशा समस्यांचं ओझं घेऊन आयुष्यभर जगतो . आता दोन व्यक्ती कोणत्या समाजाच्या हव्या , त्यांच्या वयात किती अंतर हवं हे सर्व कोण ठरवतं ?प्रेमाला उपमा नाही , ते देवाघरच देणं अशा कविता आहेत . मंगेश पाडगावकरांनी  , त्यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं तर तुमचं काय गेलं? असं म्हणतं समाजवर बोचरी टीका  केली आहे . समाज अशी टीका फारशी मनावर घेत नाही किंव्हा त्यातून काही बोध घेत नाही हा भाग वेगळा .तो एक मजा म्हणून कार्यक्रमाचा आस्वाद घेतो अन समाजात त्याला करायचं तेच करतो .

              हुज हेफनेर एक उद्योगपती व  क्रिस्टल हॅरिस यांच्या लग्नावरून उठलेलं  वादळ . कारण काय वयात मोठं अंतर . यावर भाष्य करताना स्पृहा जोशी यांनी मार्मिक टिपण्णी केली आहे . " प्रत्येक धर्मामध्ये स्वतंत्रपणे विकसित होत गेलेलं "लग्न " नावाचं एक बंधन . माणसांच्या संस्कृतिकतेचं प्रतिक . व्यक्तिस्वातंत्र्याच्या रेट्यात पुसट होत चाललेलं . " शेवटी लग्नाचा उद्देश काय हा प्रत्येकाला माहित आहे . कोणत्याही विवाह बंधनातून त्यापेक्षा वेगळं काही होत नसणार . ज्याचं त्याला ठरवू द्या की . आपल्या समाजातील धार्मिक ,  जातीय , भाषिक सामाजिक अशी उतरंड लक्षात घेता दोन निर्मळ मनांचा विचार कोण करणार आहे . कुठलाही एक समाज घ्या . त्यातही अनेक भेद आहेत . एकाच समाजातील दोन व्यक्तीच्याही  सहजता लग्न -गाठी जुळून येत नाही .  मग दोन भिन्न समाजातील लग्न व्यवहाराचं बोलणंच नको .

            माझ्या एका मित्राचं एकाच धर्मातील परंतु दुसऱ्या समाजातील मुलीशी प्रेमबंध जुळले. लग्नाचा विषय निघताच सुरु झाला समाज , जातीचा कल्लोळ . दोन्ही घरातून भावनात्मक आवाहन , धमक्या याचे सत्र सुरु झाले . दोघांनी माघार घेतली . आता समाजातील मुली शोधणं सुरु आहे . पगार , घर पत्रिका इ . कारणांनी  लग्नात विघ्न सुरु आहेत . वय वाढतं आहे . मग पुन्हा आता वयाचा  प्रॉब्लेम . जेव्हा  मन जुळली होती तेव्हा त्यांच्या मनाचा कोणीही विचार केला नव्हता . Love is marriage of true mind . हे आपल्या समाजाला मान्यच नसतं  . तुम्ही वर -वधूंच्या जाहिराती पहा . त्यात जातीचा उल्लेख स्पष्टपणे केलेला असतो . वयाचं अंतर , पत्रिका , मंगळ वैगरे निकष त्यात स्पष्टपणे नमूद केलेले  असतात .  ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांचं मत विचारात घेतलेलं असतं का ? त्याबद्दल समाजाने आधीच ठरवून टाकलेल असतं , मुलांना काय कळतंय ?

         शहरी भागात वरील निकष वाढत्या महागाईमुळे डळमळू लागतात . येथील मुख्य निकष म्हणजे EMI .स्पष्ट व्यवहार . नाहीतरी आपल्या पूर्वजांनी म्हटलंच आहे , लग्न म्हणजे व्यवहार .  तो टिकला तर बाकी मग जुळवायचं . आज महानगरात जगायचं तर दोघांचा मिळून किमान लाख भर पगार हवा . आता EMI चे हप्ते वगळले तर जे उरतं त्यात रेटायचं . हो त्यासाठी मात्र वेळ उरायला हवा . नोकरीला लागलेली हल्लीची मुलं -मुली हल्ली EMI चं गणित प्रथम जुळवून मग जोडीदार निवडतात . पुढे त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक समस्यांचा जास्त विचार करताना दिसत नाही . यातून जी पोकळी निर्माण होते त्याला सामोरे जाताना दोघेही गोंधळतात .या समस्येवर  मला काहीच प्रॉब्लेम नाही हा  सिनेमा  सुंदर भाष्य करतो .

   
         प्रेम , विवाह ,वय , जात यांचा तसा परस्पर संबंध काय ? दोन मनांच्या बंधनात तिसरा घटक येतो कुठून ? समाज हा घटक आहे . या घटकाने लैला -मजनू , fandry सारखे विषय कायम उपलब्ध दिले आहेत . समाजाने , कुटुंबाने केलेल्या विरोधामुळे अनेक प्रेम -कथा सिने जगताला रंगविता आल्या . एक दुजे के लिये , सैराट  या चित्रपटात हे सामाजिक वास्तव परिणामकरीत्या दाखवूनही अशा घटनांत घट झालेली नाही . शेवटी समाज प्रेम , लग्न या पलीकडे जाऊन त्याच्या मनांत जे परंपरेने बिंबलं आहे तेच करतो . सहज म्हणून no  religion  किंवा any  religion म्हणून पर्याय दिलेल्या वधू -वर सूचक मंडळाच्या वेब साईटवर अशा व्यक्तींची पाहणी केली .  शोधणं कठीण झालं .मुश्कीलीने एक -दोन सापडायचे .  बहुतांश वर्गवारी धर्म , जात , पगार , पत्रिका याप्रमाणेच होती . यांना क्षमस्व , यांचे स्वागत असेही उल्लेख जाहिरातीत दिसतात . कुठे आहे ती संविधानातील समता ? मनात समता निर्माण होत नाही तोपर्यंत संविधानही हतबल आहे .

        प्रेम ,विवाह आंतरिक उर्मीतून , तरल भावनेतून जुळलं तर टिकतं . नाही तर आयुष्य म्हणजे adjustment आहे अशी मनाची समजूत घालून रेटण सुरुचं असतं . वय , जात या पलीकडे जाऊन विचार करणारा प्रगल्भ समाज बदलाच्या वादळातून घुसळून निघत आहे , गोंधळला आहे . काही वेळ लागेल  स्थिरस्थावर  होईपर्यंत .लग्न -विधीचं महत्व अबाधित आहे . live in relationship चा कन्सेप्ट आला तरी त्याचं सामाजिक , व्यावहारिक दुष्परिणामाचं विवेचन होईलच यथावकाश . राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकात   लग्न -विधीचं महत्व , त्याचा सामाजिक पैलू उलगडून दाखविला आहे . तो खऱ्या अर्थाने उलगडेपर्यंत .

           

No comments:

Post a Comment