Monday, 4 August 2025

गजरा

 गजरा 


                       



अमृता प्रीतम म्हणतात ....

पुर्ण स्त्री कधी कुठल्याही पुरुषाला लाभलीच नाही...

तिच्या सर्व संवेदनासह आणि 

आतल्या संपूर्ण  आवेगासह ...

ती अस काही म्हणायची ...

त्याला कधी काही कळलच नाही.


त्याला वाटल ...

गाडी आहे...मोठ घर आहे ..

आणि घराला घरपण देणारी..

दोन गोड गोड पाखर आहेत..

सगळ तर बर चाललेल आहे...


ती म्हणायची ...

फुलांचा गजरा ...

तू मला कधी माळला नाहिस...

टेरेसवरचा चंद्र ..

हाती कधी धरला नाहीस...

डोळयात खोल बघून ...

माझ्या कधी बोलला नाहीस..

हातात हात...

प्रेमाने कधी घेतला नाहीस...


त्याला वाटल हे कसल तिच खूळ..

गजरा , चंद्र , डोळे त्यात काय आहे ?

कपल टूरला तर आताच जाऊन आलो ..

आणि सुखांची तर नुसती बरसात केली...

त्याला कळेना तरीही का तिची ही चुळ्बूळ 

त्याला कधी काही कळलच नाही ....


ती म्हणायची ...

गजरा प्रतीक आहे रे फक्त ...

कागदावर दोन गोड ओळी लिही फक्त 

नाहीतर गजरा लिही फक्त ..

तरीही मी माळीन केसात..

त्यात तुझ मन ओत फक्त ..

मनाने मनाला माळ फक्त ...


तो गोंधळला ...

ती काय म्हणतेय त्याला कळलच नाही...

आज तो गजरा शोधत होता रस्ताभर 

फुलवाली म्हणाली साहेब उशीर झाला 

या लॉकडाऊन मधे कुठे मिळणार गजरा..

आणि मिळालाच तर तुम्ही spray मारुन देणार...

अहो फक्त प्रेमाने द्या..मनाने माळा घेईल ती ..

मनाने कसा माळायचा गजरा....

त्याला कधी हे कळलच नाही ....


अजय भोसले.

Saturday, 10 May 2025

आत्मा

 

  

                                                    


      आत्मा हे  एक विश्वव्यापी  तत्व आहे. ते अविनाशी आहे.पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरात या तत्वामुळेच निर्माण होते चैतन्य, आत्मतत्त्व नित्यनूतन असतं. ते स्वयंभू आहे. ते येत नाही अन् जात नाही, केवळ असतं. ते सतत गतिशील असल्याने ही संज्ञा मिळाली आहे. परमात्मा आणि जीवात्मा हे त्याचे दोन पैलू. तत्वज्ञानात त्यास 'आत्मन'  म्हणतात. हा इंद्रियगम्य नाही. पापरहित, जरामरणापासून मुक्त, तहानभूक नसलेला शाश्वत आहे. विशुद्ध  आत्म्याला  अमृतानुभव येतो. शरीराचा व्यापार चालवणारी शक्ती म्हणजे प्राण. त्याच्या आत असतो मनोमय आत्मा. त्याच्या आत विज्ञानमय कोष आणि त्याच्या  अंतर्भागात असतो आनंदमय आत्मा. तो तटस्थ असतो. साक्षीभावाने पाहतो. अदृश्य, अचिंत्य आणि अलक्षण असतो. हे आत्म‌ज्ञान म्हणजे मुक्ती.

         या आणि अशा उच्च अध्यात्मिक  विषयांचा सखोल अभ्यास करणारे डॉ. रमेश नारायण  हे सनदी अधिकारी. 73 वर्षाचे तरुण, विशेष म्हणजे त्यांचा लेखन प्रवास वाचनांच्या छंदातून खऱ्या अर्थाने वयाच्या 65 वर्षानंतर सुरु झाला. ज्या वयात माणसं निवृत्ती पत्करतात त्या वयात नवचैतन्याने  काम करीत आहेत. वयानुसार एक ठहराव त्यांच्या स्वभावात आला आहे. या ठहरावातून आत्मा या विषयाचे चिंतन झाले आहे. जनसामान्यात मिसळून माणसातली माणुसकी शोधणारी त्यांची गुणवाहक वृत्ती पुस्तका तील बारकाव्यातून सहजपणे प्रतिबिंबीत होते .

       संसारात रमताना परब्रह्माचे ठसे त्यांना कुठं ? कसे गवसले ? हे या कथासंग्रहात वाचक समजू शकतात. मानवी आणि अमानवी वृत्तींच्या सीमेवर भेटणारे 'आत्से कसे विचित्र अन् विलक्षण असतात, हा प्रत्यय येतो. या कथांमधली पात्रं प्रत्यक्षात असू शकतात, तशीच काही कल्पनेत भेटू शकतात. मूळ मुद्दा लेखक विसरत नाही, तो म्हणजे प्रत्येकाचा आत्मा  आदराने जपणे, काही पात्रे आत्मा हरवलेली माणसे असतात, त्यांचं दर्शनही पुस्तकात सहज होते.

      आपपरभाव न बाळगता मोकळेपणाने इतरांचे ऐकून घेणे हा लेखकाचा विशेष मनोभाव. म्हणूनच या कथा जिवंत वाटतात. समोर आलेल्या व्यक्तिरेखेची बारीकसारीक स्वभाववैशिष्ट्ये सापडली, की भूमिकेचा आत्मा गवसतो , असे अभिनेते म्हणतात. लेखकसुद्धा पात्रांच्या अंर्तमनात डोकाऊन सकस लेखन करतो. कथाकार डॉ.रमेश नारायण यांचं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.समर्थ म्हणतात,


'ऐसा जो अनुभव जाला।

तोही नाशिवंतामध्ये आला 

अनुभवावेगळा राहिला ।

तो तू आत्मा । आत्माराम : 

       मनातील निरतिशय शांतीचा जो अनुभव येतो, तो अर्थातच जाणिवेच्या सूक्ष्मतम अस्तित्वा‌मुळेच! हा रसास्वाद ज्यांना घेता येतो तो कलावंत ,असाच प्रत्यय कथा वाचताना पानोपानी येतो .

    एकंदर पंधरा कथांचा हा पुष्पगुच्छ विविध रंगांचा आणि रूपांचा आहे. प्रत्येक कथेचा रसास्वाद घेताना प्रस्तावना प्रदीर्घ होण्याची संभाव्य शक्यता आहे. एकूण मांडणी सरस आणि सुरस आहे. 'जत्रा ' कथेतील शाळकरी मुले घरी न सांगता दूर जत्रेला जतात. टूरिंग टॉकिजमध्ये फुकट सिनेमा कसा पाहतात.उशीरा घरी आल्यावर ओरडणारे आणि प्रकृती बरी नसूनही नायकाला शाळेत पाठविणारे बाबा. जत्रेतल्या गमती आहेतच. शेवटी मात्र रखावालदाराचा धक्‌कादायक प्रसंग कथेची उंची वाढवतो .तर समांतर मध्ये घरासमोर राहायला आलेली ती आणि तिच्या प्रेमात पडलेला तो म्हणजे नायक शाम.

दोघांतील आंतरिक ओढ, निरोपाची केविलवाणी व्याकुळ अवस्था हे प्रसंग लेखकाने अत्यंत तरलपणे टिपले आहेत. तिचं एक गुपित लेखक शेवटी सांगतो. त्यांने या कथेला पूर्ण कलाटणी मिळते. या कथेतून लेखक वाचकांची उत्सुकता शिगेला नेतात.


'हिरमोड' कथेतील सुरेशची गावस्मृती विलक्षण बोलकी आहे. शेती विकल्पावर, घर ठेवल्यावर फार परकेपण जाणवते. गाव 'आपला आहे, या आप्तभावनेने तो जातो अन् आपलेपण हरवल्याचे दिसते. पडक्या घरात राहायचे कसे? काकूकडे गेल्यावर अंतरीची ओल दिसत नाही. महिनाभर राहण्याचा इरादा असतो, पण एका दिवसात गाव सोडावा लागतो. घरचे लोक परत जाताना निराश होतात. लेखकाने संवाद टाळून कयेतील उदासीनताअबोलपणे परिणामकारक साधली आहे.


"बळी कथेची सुरुवातच अशी आहे, की उत्सकतेपोटी वाचक वाचू लागतो. एका नोकरदाराची ही कथा. कार्यालयातील विविध प्रवृतीच्या लोकांच्या मनोवृतीचा लेखाजोखा त्यांनी या कथेत मांडला आहे.कुठल्याही माणसाच्या आयुष्यात असे घडू शकते . लेखकाची संवेदनक्षमता , प्रसंगाचे अचूक अवलोकन, विविध स्वभाव वैशिष्टये, प्रसंग, धक्‌का तंत्र यांनी पुस्तकाची मांडणी मनोरंजक केली आहे.

सोबत, आत्मा, जगरहाटी, उध्वस्त , झोका आणि आधार या कथासुद्धा लक्षणीय आणि चित्तवेधक आहेत. सर्व कथांत जाणवणारी विशेष म्हणजे यांत गाव आहे, नागरी जीवन आहे, जीवनांचे अनेक पैलू आहेत. लेखकाची अचूक संवेदनशीलता आणि त्याचे अचूक अवलोकन याने ,लेखक समाजात किती खोलवर रुजलाय याचा अंदाज येतो. या कथेतल्या पात्रांशी तो एकरूप झालाय याची साक्ष पटते . दुसरा मुद्दा असा की, मध्यमवर्गीयांच्या पार्श्वभूमीवर वावरणारी काही पात्रे नात्यातील जाणीवा आणि उणिवा स्पष्ट करतात. संबंधातील मर्यादा अधोरेखित करतात. मानवी जीवनाचा अफाट विसंगत आणि विषय रूपगंधांचे संदर्भ त्यातून मिळतात.


डॉ. रमेश नारायण यांची शैली आशयानुसार बदलते. काही कथांत ते तपशील भरतात. कथा खुलतात. काही कथा हळूवार, नाजूक फुंकर घालतात. सतत प्रतिमांचा उपयोग न करता कथा वाचनीय ठरते. आशयाचे अविभाज्‌ घटक कसे आणि कोणते असतात, हे प्रत्यक्ष वाचल्याशिवाय कळणार नाहीत.


डॉ .रमेश नारायण यांचे कथाविश्व वाचकास माणसांच्या जगण्या-वागण्याचे वेगळेपण दाखवते. ओळखीच्या चौकटीबाहेर जे अगाध जग रंगीबेरंगी लीला करते, ते आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न डॉ. रमेश नारायण मनापासून करताना दिसतात. कोणत्याही समाजाचे सुसंकृत वस्त्र विणताना संस्काराचे उभे -आडवे धागे एकता ,समता आणि समरसता साधण्याचा प्रयत्न लेखक हा विणकाराच्या भूमिकेतून प्रामाणिकपणे करतो .त्यातून तो आपल्या परिवर्तनशील मनाचे दर्शन घडवतो .अर्थात हा बदल संथपणे होत असल्याने वाचक तटस्थपणे 'जुने ते सोने ' अनुभवतो आणि 'नवे ते हवे ' हेही सांगतो . अनेक गोष्टींचा परस्परसंबंध आणि त्याचा अन्वयार्थ लावणे फार कठीण वाटत नाही .प्रस्तुत 'आत्मा' दृश्यरूपाने आपले रंजन करतो,हेच तर हवंय ना वाचकांना.


अजय भोसले

कवी,अमूर्त चित्रकार,सुलेखनकार, blogger







Friday, 9 May 2025

Procreate digital art


 

मुखवटे

     

                                       


   मी ज्या सध्या ज्या सोसायटीत राहतो तेथे अनेक वृद्ध जोडपी ,काही एकटे वृद्ध राहतात . बहुतेकांची मुलं परदेशात . अलीकडे सोसाटीच्या नोटिसबोर्ड  वरून कळत होत ,काही वृद्ध जग सोडून गेले . जे गेले आणि जे उरले आहेत त्यांचं इथं कुणीही नाही ,एकटेपणाशिवाय !सकाळी दिसतात . मुलं इथं नाहीत याची त्यांना खंत नसेल असं नाही .परंतू प्रसन्नतेचे मुखवटे लेऊन फिरत असतात . कमालीची maturity .       

भौतिक  संपन्नता आहे त्यांच्याकडे पण ते संपन्न आहेत का ? अर्थात  आपण त्यांच्या मनात डोकावू शकत नाही .प्रसन्नतेच्या मुखवट्याआड दिसणाऱ्या खिन्नतेवरून फार तर अंदाज बांधता येऊ शकतात . तुका म्हणे आता तुझी जवळीक ,तुजविन आता मज कोण आहे पांडूरंगा !

अजयभोसले .

Thursday, 8 May 2025

हिवरे बाजार




पार्श्वभूमी


                हिवरे बाजार हे अहमदनगर जिल्ह्यातील शिवकालीन नाते असलेलं  एक  समृद्ध  गाव . परंतु १९७२ च्या दुष्काळानंतर या गावाची स्थिती बदलली . दारू ,शिक्षणाचा अभाव यामुळे गावाला अवकळा आली . १९८९ नंतर पोपटराव पवार यांच्या नियोजनबद्ध  विकास कार्यक्रमामुळे गावाचा विकास झाला असून आता हे गाव एक आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे . शाळा , ग्रंथालय , विहिरी ,झाडे   यांना महत्व दिल्यामुळे जगभरातून लोक गावाचा अभ्यास करण्यासाठी येतात . 


गावातील उपक्रम

शिक्षण

व्यसनमुक्ती 

सेंद्रिय शेती 

पाणलोट विकास 

पशुधन विकास 

महिला सक्षमीकरण 

सौर ऊर्जा 

परिणाम

पाण्याची उपलब्धता वाढली

सुधारित पीक उत्पादन (300%)

वाढीव उपजीविका (50% उत्पन्न वाढ)

चांगले शिक्षण (९० टक्के उपस्थिती)

सशक्त महिला (30% बचत गट सदस्यत्व)

ऊर्जा खर्च कमी (80%)

     प्रशासन, धोरण  आणि गाव 

            राज्याचा विकास करताना धोरण आखणी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे . त्यानंतर अंमलबजावणीचा भाग  क्षेत्रीय पातळीवर येतो . शासन  धोरणाची आखणी करत असताना  समन्यायिक तत्वाच्या आधारे आखणी करत असते . परंतु एका गावाचा विकास होतो आणि अन्य गावाचा नाही याचा अर्थ अंमलबजावणीतील उदासीनता हाही एक भाग दिसून येतो . सरपंचाशी झालेल्या चर्चेतून असे दिसून आले की , ग्रामीण पातळीवरील समस्यांचा अभ्यास न करता , स्थानिक लोकांची मते विचारात न घेता धोरणे आखली जातात . आता इथे प्रश्न येतो मंत्रालयीन धोरण आखणी पद्धतीचा . पूर्वी कोणतेही धोरण आखताना संबंधित विषयातील तज्ञाची समिती नेमून त्या आधारे धोरण आराखडा तयार होत असे . कोणतेही धोरण पूर्ण  राज्यावर परिणाम करणारे असल्यामुळे मला धोरण आखणी करताना खालील तीन मुद्दे विचारात घ्यावे असे वाटते . 

१}  क्षेत्रीय तपासणी 

२}  तज्ञांचे  मत 

३} प्रशासनिक पातळीवर सर्व अंगाने चर्चा 

४} धोरण आखणी 

उपाययोजना 

          गाव पातळीवर  शासनाच्या अनेक योजना आहे . अशा सर्व योजनांची एकत्रित माहिती उपलब्ध करून त्याबाबत ग्रामपातळीवर सजगता वाढविणे आवश्यक आहे . शिक्षण , सजगता , अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा आधारे हे साध्य  करता येईल.  यातील लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.


Ajay Bhosale.

Saturday, 30 May 2020

दृष्टी

        





        "Shallow hal " नावाचा एक चित्रपट पाहिला होता. hal फक्त आकर्षक महिलांना डेट करायचा.त्याच्या दृष्टीने शारिरीक सौंदर्य प्राथम्याच होत.तो रोझमेरी नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडतो. खरतर ती लठ्ठ असते.परंतु ,लिफ्ट मध्ये एक गृहस्थ त्याला तिचे आन्तरीक सौंदर्य बघण्यास संमोहित करतो. रोझमेरी मनाने खूप चांगली असते.तिच्या निष्पाप आन्तरीक सौंदर्यामुळे त्याला ती खूप आवडू लागते. परंतु संमोहन उतरलया नंतर त्याला धक्का बसतो.तो डिप्रेशन मधे जातो. तो तिला टाळू लागतो. त्याला मग शारिरीक सौंदर्यापेक्षा मानसिक सौंदर्याचे महत्व पटते .चित्रपटाचा शेवट गोड होतो.

            परंतु ,प्रत्यक्ष आयुष्यात अस होत असेल का? मनुष्य हा सर्वसाधरणत: मनाच्या सौदर्यापेक्षा भौतिक सौंदर्याने आकर्षित होत असतो .हे भौतिक सौंदर्य काहीकाळ दिसेनास झाल तर तो तितक्याच आसक्तीने प्रेम करेल का? पुरुषाच प्रेम भौतिक असत तर स्त्रीच भावनीक हे मानसशास्त्राने स्वीकारलेल तत्व आहे.मला इथेच मुबईत घडलेली एक कथा आठवली.

             एक राजा राणी मुंबईच्या छोट्या फ्लैट मधे आनंदाने रहात असतात.दोघही नोकरीला घरात सुबत्ता. तो तिला आवडायचा.ती त्याला आवडायची . तिने आपले सर्वस्व त्याला समर्पित केले होते. ती त्याच्या कुठल्याही मागणीला नाही म्हणायची नाही.नोकरीचा झेंडा मिरवायची नाही. तो राणी राणी म्हणताना थकायचा नाही. ती हवेत विहरायची. जे अनेक स्त्रियांच्या वाट्याला आलेल घरकाम चुकत नाही ते ती कुरकुर न करता करायची. तो फक्त पहायचा. त्याला काय हव नको ते सारखी पहायची .आजारी असो नाहीतर नसो. त्याच्या प्रेमळ शब्दांनी विरघळायाची. मूड नसला तरी मागणी पुर्ण करायची. आताशा तिच वजन वाढल होत . तो तिला जोग्गिंग ला घेउन जायचा.व्यायाम करवून घ्यायचा. तिला केवढ कौतुक . तिच्या अपेक्षा थोड्या होत्या . त्या सर्व पुर्ण होत असल्यामूळे आपल्या परिघात ती खरच खूप आनंदी होती.
         पण आता तर ती आजारी पडू लागली होती.ओब्सेसिटी मुळे तिच वजन प्रमाणाबाहेर वाढ़ु लागल तसतस राणी राणी ऐकू येइनास झाल. त्याचे उबदार स्पर्श लुप्त झाले . ती भांबावली बिचारी. तिला वाटलं मी तर तिच आहे मग त्याला अनोळखी का वाटतेय. तिन विचारायच ठरवल . "का अस वागतो आहेस तू. रोज मला वेळ काळ न पहाता हट्टाने जवळ घेणारा तू मला आता टाळतो आहेस?" तो म्हणाला..".तुला व्यायाम करायला सांगितल तुला interst नाही.आळशी आहेस तू ."ती म्हणाली ..."त्याचा काय संबंध...हा आजार आहे वजन वाढणाराच ..." तो म्हणाला...."बघ स्वताकडे जरा" ती म्हणाली ..."मी तर तशीच आहे " तो..."काय तशीच आहे....बघवत नाही ...बेडौल झाली आहेस.." तिला धक्का बसला ..."पण माझ मन तसच आहे ..पुर्वीसारख " तो ...." काय करु तुझ्या मनाच ..त्यान सुख मिळत नाही " ती आता कोसळली होती .." सुख फक्त शारिरीक असतं का " तो..."मग दुसर काय असत" ....ती ...." म्हणजे माझ्याकडून व्यायाम करुन घेण ,तुझी काळजी नव्हती ...गरज होती"
तो ... "तसच समज "
       .  ती निराशेच्या खोल गर्तेत गेली होती.तिने त्याच्या वाटेल त्या मागण्या पुर्ण केल्या होत्या .शारिरीक असो वा अन्य काही .फक्त त्याच्यासाठी . फक्त शरीराचा आकार बदलल्याने आता ती नकोशी झाली होती ,पण आत्मा तर तोच होता ना. तिच्या आसवांनी उशी भिजली होती. तिच्या मनाची कोंड फुटत नव्हती . ती मनाशी एकटीच सारखी बडबडत होती "अरे पण मी तर तीच आहे ना.....अरे पण मी तर तीच आहे ना "

Saturday, 4 April 2020

दृष्टी

          आज एका पुस्तकाबाबत   चेहरापुस्तका  ( एफ बी )वरील एका निर्गुण फ्रेंडशी  मायाजालावर संवाद चालला होता . निर्गुण यासाठी की , अशा माध्यमावर आपण निर्गुण स्वरूपात संवाद साधत असतो.  त्यापैकी अनेकांना सगुण स्वरूपात  कधी  पाहिलेलेही  नसते.  मला वाटते याची आवश्यकताही नसावी.  सगुण  देह  एकमेका समोर आले  की  ,काहीवेळा भ्रमाचा भोपळा फुटायला  वेळ लागत नाही; याचा fb कारांनी मानसशास्त्रीयदृष्ट्या नक्कीच अभ्यास केला असणार .  सगुण देहधारी   दोन माणसं एकमेकासमोर आली की,  अपेक्षा, भावना, इच्छा ,आकांक्षा  यांचं एक असं जाळं निर्माण होतं की, एकवेळ संगणकाच्या मायाजालातून आपण बाहेर पडू शकू परंतु याच्या नाही .  त्यामुळे निर्गुण स्वरूपातचं  संवाद साधणं सोयीचं आहे.  आणि करोनामुळे  सद्यस्थितीत हाच एक  उत्तम उपाय आहे.  ज्या निसर्गाने ही उत्पत्ती केली आहे त्यात सोशल डिस्टसिंग का आवश्यक आहे,  हे भौतिक आणि मानसिक दृष्ट्याही पटायला लागतं. सिल्व्हेस्टर स्टॅलोनचा, सॅन्ड्रा बुलॉक   यांचा एक चित्रपट पाहिला होता. एका  प्रगत संस्कृतीबाबत  . ज्या संस्कृतीत कुठल्याही प्रकारचा स्पर्श करण्यास सक्त मनाई आहे . कारण स्पर्शामुळे विषाणु,किटाणु इत्यादींचा संसर्ग होऊ शकतो . त्यामुळे  प्रेमही तंत्रज्ञान वापरून करायचं . आज हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे सद्यस्थिती . करोनायण .  

      lockdown  मुळे झालंय काय? भरकटायला होतंय. अन्य वेळी आम्ही पती , पत्नी , बहीण ,भाऊ , मित्र , आई , बाबा यांच्याशी किती वरवरचं बोलत असतो . या lockdown मुळे मनाचा अगदी निचरा होईपर्यंत संवाद साधायला लागलो आहोत . हो ... आम्ही आता फक्त बोलत नाही...  . संवाद साधत आहोत . त्यामुळे पर्यावरणाबरोबर मनंही स्वच्छ व्हायला लागली आहेत . 

      थोडा भावुक झालो .  मूळ विषय राहीला बाजूला. विषय होता निर्गुण फ्रेंडचा आणि सुचविलेल्या पुस्तकाचा  . निर्गुण , सगुण असे शब्द वापरले की , जरा वजन येत लिखाणाला . बाकी कोणताही हेतू नाही .  तर ते पुस्तक होतं , मौनराग....  महेश एलकुंचवार यांचं  ते पुस्तक सद्यस्थितीत  मिळणं  शक्य नव्हतं , म्हणून बुकगंगा च्या संकेतस्थळावर  शोध सुरु केला . निदान  काही भाग वाचायला मिळावा म्हणून .  अशा संकेतस्थळावर एक बरं असतं ,पुस्तकाची ओळख व्हावी म्हणून एक दोन पानं फुकट वाचायला देतात.  या काळात बसल्याबसल्या अशी अनेक  पाने  वाचून काढली  आहेत.  याचा  अजून एक फायदा असा होतो की ,पुस्तक घ्यावं की नाही याचा निर्णय तात्काळ  घेता येतो . 

           तर विषय अंत्यविधीबाबत होता . मजकुर काही असा होता .. 
          "कचकच वाजणारी ताटी , क्वचित जोराचा हिसका बसला की हलणारे ते जड मस्तक ,अंगावर पांघरलेले जाडशुभ्र प्रेतवस्त्र , फुलांच्या प्रेतमाळा ह्यात कुठेही सौंदर्य नव्हते . गंभीरताही नव्हतीच . ख्रिश्चनांच्या ,मुसलमानांच्या प्रेतयात्रांना किती , एक वेगळे गंभीर सौंदर्य असते ...... ..इ . "

         मला मोठी गंमत वाटली . आज अवतीभवती ज्या वेदनामय घटना घडत आहेत, कानी पडत आहे ,  त्यामुळे  वाचनाला भरपूर  वेळ असूनही आस्वाद घेता येत नाहीये . वाचन मात्र होतंय . मी या ललित लेखनाकडे आता भाषेचं सौंदर्य म्हणून न पाहता , भौतिक, व्यावहारीक दृष्टीतून चाचपून पाहत  होतो . त्याचं दुसरं कारण मी अलीकडे वाचलेलं एक अन्य पुस्तक . त्यात अशी माहिती होती की जर्मनी येथे अंत्यसंस्काराची पद्धत परंपरेप्रमाणे , धर्माप्रमाणे दफनविधीची आहे . परंतु तेथे दफनविधीला जागा उबलब्ध होत नसल्यामुळे, परवडत नसल्यामुळे  बहुतांश लोक दहन करतात . म्हणजे लेखकाची दृष्टी काही असली तरी सामान्य  जनतेची  दृष्टी व्यावहारीक असते. तिला अलंकारीक सौंदर्य आणि परंपरा नेहमीच परवडतात असं नाही  आणि माझ्यासारख्या वाचकाची सौंदर्यदृष्टीही परीस्थितीनुरुप बदलत असते.